राज्यात या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता
पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून राज्यातून मान्सून पूर्णपणे परत माघारी गेल्यानंतर दिवाळी नंतरच्या कालावधीत अवकाळी पाऊस होत आहे. यंदाही या अवकाळी पावसाची पूर्व स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.आज संध्याकाळपासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व ७ आणि खान्देश, नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व 10 तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अश्या महाराष्ट्राच्या एकूण 23 जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान २३ ते २४ नोव्हेंबर केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
शनिवार ते सोमवार, म्हणजे २५ २६ आणि २७ नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवार २६ नोव्हेंबर (कार्तिक पौर्णिमे) ला पावसाचे वातावरण अधिक गडद होणार आहे. खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, या जिल्ह्याच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता अधिक जाणवते. मुंबईसह कोकणात ह्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मात्र अधिक येथे तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन किमी उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राचा पसरले आहे. तसेच १५ अंश अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या तामिळनाडू आणि केरळ राज्यावरून पश्चिमकडे वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे चक्रीय वाऱ्याच्या स्थिती निर्माण झाली आहे.
या प्रतिकुल हवामान स्थितीमुळे तामिळनाडू आणि केरळ राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे. ही प्रणाली भू -भाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करत आहे.परिणामी महाराष्ट्रात उद्यापासून येता आठवडाभर अवकाळा पावसाचे संकट घोंगावणार आहे.
SL/KA/SL
22 Nov. 2023