‘चला हवा येऊ द्या’ घेत आहे प्रेक्षकांचा निरोप

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. निलेश साबळे यांच्या खुमासदार लेखन दिग्दर्शनाखाली गेली ९ वर्षे दर आठवड्याला झी मराठी वाहिनीवर सुरु असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.. चला हवा येऊ द्या दिग्दर्शक – लेखक – अभिनेता निलेश साबळेने स्वतः ही माहिती दिली आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चला हवा येऊ द्या ऑफ एअर जाणार असल्याचं सांगितलं निलेशने सांगितले आहे. निलेश म्हणाला, “गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय.”
‘लय भारी’ चित्रपटाच्या वेळी रितेश देशमुखने मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी एक मंच असावा अशी कल्पना बोलून दाखवली होती. त्यानंतर प्रयोग म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ‘चला हवा येऊ द्या’ची गाडी भरधाव सुटली. आजवर या कार्यक्रमाचे १ हजारांहून अधिक भाग प्रसिद्ध झाले आहेत. निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रीके अशा एकाहून एक सरस कलावंताच्या अभिनयाने महाराष्ट्रातील घराघरात हास्याचे फवारे उडाले.
मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. एकेकाळी प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम होता. पण कार्यक्रमात प्रेक्षकांना वैविध्य हवे होतो. त्यामुळे टीआरपी लिस्टमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम खूप मागे पडला. नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.
मात्र एक खुशखबर म्हणजे येत्या सहा महिन्यात पुन्हा हा कार्यक्रम सुरु होणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
SL/KA/SL
28 Oct. 2023