पाकिस्तान गुडघ्यांवर झुकला, नाक घासून मागितली शस्त्रसंधी

नवी दिल्ली, दि. १० : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून भारतीय सैन्याने धडक कारवाई सुरु केली आहे. भारताने नियोजनबद्धपणे पाकमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याचा सपाट लावला आहे. या पाक सैन्याकडूनही भारतीय सीमाभागांतील नागरिकांवर भ्याड हल्ले चढवण्यात येत आहेत. या साऱ्या युद्धाच्या धुमश्चक्रीत आधी अलिप्त भूमिका घेतलेल्या अमेरिकेने उडी घेतली दोन्ही देशांना युद्धबंदी करण्याचे आवाहन केले आहे. याबाबतची विनंती पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर भारताने ती मान्य केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देश एकमेकांवर लष्करी कारवाई करणार नाही, हा निर्णय आता घेण्यात आला आहे. या तणावाबाबत तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश विचार करणार असून याबाबत १२ मेला पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की,
“पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्कराच्या महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सुरु असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराचे ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.”
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार सोशल मिडियावर लिहिले आहे की,
‘भारत आणि पाकिस्ताननं तत्काळ शस्त्रसंधी करण्याबद्दल सहमती दर्शवली. पाकिस्ताननं कायमच प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केले आहेत. दक्षिण आशियात शांतता नांदावी यासाठी आम्ही नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे’.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,
‘अमेरिकेच्या मध्यस्थीखाली काल रात्री झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे कळवताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने हल्ले तात्काळ आणि पूर्णपणे थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.