२०३१ पर्यंत भारत होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने स्पष्ट केले आहे. वर्ष 2031 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज क्रिसिलने वर्तवला आहे. क्रिसिलने पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.क्रिसिलच्या मते, 2031 पर्यंत भारत उच्च मध्यम उत्पन्न असलेला देश बनेल. यामुळे भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन 7 ट्रिलियन डॉलरवर जाईल. क्रिसिल रेटिंग्सने आपल्या ‘इंडिया आउटलुक’ अहवालात म्हटले की भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणांचा पाठिंबा मिळेल. त्याचबरोबर 2031 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची आपली वाढीची शक्यता राखेल आणि सुधारू शकेल.
या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा 7.6 टक्के वाढ झाल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढ 6.8 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. अहवालात क्रिसिलने म्हटले की पुढील सात आर्थिक वर्षांत (2024-25 ते 2030-31) भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून सात ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचेल. या कालावधीत अंदाजित सरासरी 6.7 टक्के वाढ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल आणि त्याचे दरडोई उत्पन्न 2030-31 पर्यंत उच्च मध्यम उत्पन्न गटापर्यंत पोहोचेल.
भारत सध्या 3.6 ट्रिलियन डॉलरच्या जीडीपीसह जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारतापुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी आहेत. 2030-31 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 6.7 ट्रिलियन डाॅलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा क्रिसिलला आहे. तोपर्यंत देशाचे दरडोई उत्पन्न देखील 4,500 डाॅलरपर्यंत वाढेल आणि भारत उच्च-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात सामील होईल.
SL/KA/SL
7 March 2024