ब्रह्मपुरी तालुक्यातील 33 गावांना पुराच्या वेढा, 23 गावांचे मार्ग झाले बंद.

चंद्रपूर दि १०:— तीन दिवस बरसलेला संततधार पाऊस आणि गोसे खुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचे पाणी शिवारात शिरल्याने नाले दुथडी भरून वाहत आहेत. काल ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील ३३ गावांना पुराने वेढा घातला. संततधार पावसाने नऊ गावांतील ३० घरे व अनेक गोठ्यांची पडझड झाली. झळ सुरू असल्याने पूर आणखी वाढू शकतो.
त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात तीन
दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला. पुराचे बैंक वॉटर नाल्यांमध्ये आल्याने २३ गावांचे मार्ग बंद झाले आहेत. पाणी शिवारात शिरल्याने शेतीची कामे ठप्प झाली. मार्ग बंद असल्याने तालुकास्थळाशी संपर्क तुटला. रपटे वाहून गेल्याने बोरगाव, झिलबोडी, परसोडी, नवेगाव, चिखलगाव, अहेर, पिंपळगाव, भालेश्वर, नांदगाव आदी गावांची अडचण निर्माण झाली. पारडगाव नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने पारडगाव, बेटाळा व बोडेगाव परिसरातही नागरिकांचीही कोंडी झाली.
वैनगंगा नदीचे पाणी वाढतच असल्याने नागरिकांनी सावध राहावे, अशा सूचना महसूल प्रशासनाने दिल्या आहेत.
बंद झालेले मार्ग
किन्ही-चौगान, बेटाळा-बोढेगाव, किन्ही जुनगाव, ब्रह्मपुरी-पारडगाव, चौगान-जुगनाडा, ब्रह्मपुरी-वडसा, खंडाळा कन्हाळगाव, कुर्झा-नांदगाव, उचली-मौशी, कालेता-नान्होरी, कुर्झा-अहेर, पारडगाव-ब्रह्मपुरी-मालडोंगरी, दुधवारी-ब्रह्मपुरी-देलंगवाडी, बरडकिन्ही-आवळगाव,
हळदा- मुडझा-कुडेसावली, बांद्रा-कोसंबी-भुज तुकूम, गांगलवाडी-आरमोरी-ब्रह्मपुरी, गांगलवाडी-आवळगाव-मुडझा, गांगलवाडी-मांगली-जुगनाळा, खरकाडा-रणमोचन, निलज-पिंपळगाव-खरकाडा, मुई-बेलपातळी-रुई आदी मार्गावरील नाल्यांना पूर आल्याने मार्ग बंद झाले आहेत. ML/ML/MS