मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगेसह राज्य सरकार , मुंबई पोलिसांना नोटीस

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर
आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या सह राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली आहे.
तसेच मनोज जरांगे यांना आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं, अन्यथा येत्या २६ जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. लाखो मराठा आंदोलकांसह जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे. आरक्षणाची मागणी करून मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत आहेत. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा,अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी घेण्यात आली.
यावेळी न्यायालयाने मनोज जरांगे यांच्यासह आझार मैदान पोलीस आणि राज्य सरकारलाही नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने आंदोलनादरम्यान पोलीस आणि राज्य शासन कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. यादरम्यान गरज वाटल्यास सदावर्ते यांना पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. Bombay High Court Notice to Manoj Jarange along with State Government, Mumbai Police
ML/KA/PGB
24 Jan 2024