ऑपरेशन सिंदूर”ला बी एम एस “चा पाठिंबा

मुंबई, दि. 12
भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) केंद्रीय कार्यकारिणी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक दिनांक ०९ मे २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. या बैठकीत भारत सरकारने नुकतेच यशस्वीपणे राबवलेले “ऑपरेशन सिंदूर” यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन करण्यात आले. हे ऑपरेशन, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध भारताच्या ठाम धोरणाचे आणि निर्धाराचे प्रतीक आहे.
या बैठकीत बीएमएसचे अध्यक्ष श्री. हिरण्मय पंड्या यांच्या अध्यक्षतेखाली पारित झालेल्या ठरावामध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व कौशल्याचे, संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या सामरिक दूरदृष्टीचे आणि गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्या अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीकरणासाठीच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे देशवासीयांमध्ये आत्मविश्वास आणि राष्ट्राभिमान दृढ झाला आहे.
बीएमएसने पाकिस्तानच्या उकसवणूक धोरणाचा, सीमापार गोळीबाराचा आणि नागरी भागांना लक्ष्य केल्याचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र भारतीय सेनेने तो यशस्वीपणे निष्फळ ठरवला.
बी एम एस चे निर्देश – राष्ट्र प्रथम धोरणाअंतर्गत:
- सर्व संबद्ध संघटनांनी सर्व प्रकारच्या संप, आंदोलन व निदर्शने तात्काळ स्थगित करावीत.
- गरज भासल्यास अतिरिक्त मोबदला न घेता ओव्हरटाईम करून उत्पादकता वाढवावी.
- कामगार व नागरिकांमध्ये युद्धजन्य परिस्थितीत सजगता व नागरिक जबाबदारीची भावना जागृत करावी.
- रक्तदान, नागरी मदत, स्थानिक वाहतूक व सुरक्षा मोहिमेत जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
- सशस्त्र दलांना समर्थन देण्यासाठी जिल्हा व औद्योगिक पातळीवर एकजुटीचे कार्यक्रम आयोजित करावेत.
- अत्यावश्यक नसल्यास सुट्टी न घेणे व पूर्वनियोजित रजा रद्द करून कामावर हजर राहणे.
या बैठकीत १९६२, १९६५, १९७१ व कारगिल युद्धांप्रमाणे ‘राष्ट्रीय मजदूर मोर्चा’ पुन्हा कार्यान्वित करून राष्ट्रवादी ट्रेड युनियनचे संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून भारत सरकारला पूर्ण पाठिंबा देता येईल.
बीएमएसचे आवाहन:
“हा काळ आहे राष्ट्रभक्ती कृतीत उतरवण्याचा. जसे पूर्वी बी एम एस ने प्रत्येक संकटकाळात राष्ट्राच्या पाठीशी ठाम उभे राहून योगदान दिले, तसेच आजही भारताच्या अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आम्ही पूर्ण निष्ठेने समर्पित आहोत.” असे मनोगत भारतीय मजदूर संघ केंद्रीय अध्यक्ष हिरणमय पंड्या व महामंत्री रविंद्र हिंमते यांनी मार्गदर्शन करताना केले आहेत.
भारतीय मजदूर संघ च्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील संघटीत, असंघटीत क्षेत्रातील कामगार, कंत्राटी कामगार संघटना, देशातील ठेका मजदूर, संविदा मजदूर, संघटना कॄती कार्यक्रम राबविण्यात येणार असून या देशातील कंत्राटी कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या सोबत एकत्रित होवून उभे राहावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहेत. KK/MS