विरोधकांना संपवून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव

गडचिरोली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशांतील प्रत्येक नागरिकांला समान हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. माञ सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशांतील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखले नाही तर स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणुन जगावे लागेल.ही अंतिम निवडणूक समजून हुकूमशाही आणू पाहणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
ते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ नागभिड येथे आयोजीत सभेत बोलत होते. आयोजित प्रचार सभेस प्रमूख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर , इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव गावंडे, काँग्रेस अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, हसन गिलानी, काँग्रेसचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजुरकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, ॲड. गोविंद भेंडारकर, नरेंद्र हेमने, डॉ.कावळे , मंगेश सोणकुसरे, भास्कर शिंदे, डॉ. रघुनाथ बोरकर, विनोद बोरकर, खोजराम मरस्कोल्हे, साहिस वारजुरकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशांतील शेतकरी, कामगार, युवक नोकरदार वर्ग आणि सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यामुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असून आता विरोध करणाऱ्या विरोधकांना संपविण्याचा डाव आखला जात आहे. खते, जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅस यात प्रचंड दरवाढ आणि जीएसटी च्या माध्यमातून जनतेची लूट केल्या जात आहे. अश्या निष्ठूर सरकार विरुद्ध आता पेटून उठून देशातील संविधान टिकविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
देश सुरक्षित नाही, देशांतील महीला सुरक्षित नाही, महीला खेळाळूचे शोषण करणारे मोकाट फिरत आहे. अशी अवस्था देशाची झाली आहे.तर विद्यमान खासदार अशोक नेते हे संसदेत मौन धारण करून बसतात अश्या मौनी बाबाला उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार देतात हि हास्यास्पद बाब असल्याची टीका विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.तर देशातील
भाजप सरकार हे आदिवासी, शेतकरी, कामगार, युवक विरोधी सरकार असून देशाच्या शेतकऱ्यांना आजवर हमीभाव दिला नाही. देशांत तानाशाही सुरु असून पक्ष फोडल्या जात असल्याचे माजी आ. डॉ. अविनाश वारजुरकर यांनी यावेळी सांगितले.
देशात सत्तापीपासू नी बहुजनांना धर्म जातीमध्ये विभागून तसेच स्वतःचा पराभव दिसताना पुलवामा सारखे कांड घडवून निष्पाप सैनिकांचा बळी घेतल्याचे व त्यातून सत्ता काबीज केल्याचे पाप केले गेले आहे. अशा निष्ठावर निर्णय सरकारला अर्ज पार करण्यासाठी मला सेवेची संधी द्यावी असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांनी केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली – चिमूर लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नागभिड तालुक्यांतील आणि परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
ML/ML/SL
4 April 2024