भाजपला हवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभेपेक्षा मोठा विजय

शिर्डी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डीत पार पडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून जोरदार हल्लाबोल केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद पार्ट-2 सुरू असल्याचा खळबळजनक दावा केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला 20 फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते, 2019 ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले आहे, असे अमित शहा म्हणाले.काही निवडणूक या देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. विरोधकांचे महाराष्ट्रात येण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिल्याचे अमित शहा म्हणाले.
आपल्यासमोर बांगलादेशी घुसखोरांचे मोठे आव्हान आहे. देशात अलिकडच्या काळात बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. ते कागदपत्रे बनवून मतदार याद्यांमध्ये घुसत असल्याचा दावा केला. मालेगावमधून शेकडो नवीन जन्मप्रमाणपत्र लोकांना मिळाले. मालेगाव, अमरावतीतील अंजनगाव याठिकाणी अचानक 100 लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळत आहे. 50-60 वर्षांचे लोक जन्मप्रमाणपत्र काढत आहेत. हा व्होट जिहादचा पार्ट सुरू झाला आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. या घुसखोरांना बाहेर काढण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.
श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान विरोधी शक्ती, आराजकतावादी शक्तींचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. भाजप आणि मोदींना पराभूत करता येत नाही, असे जेव्हा काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची पार्टी यांना वाटले, तेव्हा त्यांनी आराजकतावादी सारख्या शक्तींना एकत्र घेऊन या देशात आणि आराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या महाराष्ट्रात व्होट जिहाद, फेक नरेटीव्ह बघितला. परंतु, गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय विचारांच्या संघटनांची एकत्र येऊन राष्ट्रवादाचे पुन्हा रोपण केले आणि अराजकतावादी ताकदींना विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभूत केले. त्यांना पराभूत केले, तरी त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.
SL/ML/SL
12 Jan. 2025