मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लागल्या रांगा

महाड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्याने रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशी अर्ध्यातच अडकून पडले होते. महामार्ग चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे.
महामार्गावर छोट्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गावी कधी पोहचायचं असा प्रश्न सणासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पडला आहे. सलग दोन तीन दिवसांची सुट्टी आणि होळीचा सण असल्याने शिमगोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे.
गणेशोत्सवाप्रमाणेच होळीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हाल होत आहेत.
महामार्ग पोलीस ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत असताना दिसत आहे.
ML/ML/SL
24 March 2024