भिवंडीतील नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा;
खासदार बाळ्या मामांनी मनपा अधिकाऱ्यांना धरले धारेवर….

मुंबई, दि 26
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अवकाळी पावसाने मागील महिन्याभरापासून हजेरी लावली असतानाही मनपा प्रशासनाने नालेसफाईच्या कामात दिरंगाई केली असून ठेकेदारांसह मनपा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचून शहर तुंबण्याची शक्यता निर्माण झाल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.सोमवारी खासदार बाळ्या मामा यांनी तीन बत्ती येथील नालेसफाईच्या कामाचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला.यावेळी नालेसफाईच्या कामात प्रचंड हलगर्जीपणा झाला असल्याची बाब म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांसमोर दाखवून दिली.या पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी खा. बाळ्या मामा यांच्या कडे पावसाळ्यातील नालेसफाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचे गाऱ्हाणे मांडले.विशेष म्हणजे म्हात्रे यांनी अचानक केलेल्या नाले सफाईच्या कामाच्या पाहणी दौऱ्यामुळे पालिका प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले.
येणाऱ्या पावसात पाणी साचून नागरिकांचे नुकसान होणार आहे,परंतु याची तमा पालिका प्रशासन अधिकारी कर्मचारी यांना नाही,येथील अधिकारी व ठेकेदार मस्त असून यांच्या हलगर्जीपणामुळे जनता त्रस्त झाली आहे असा आरोप खासदार बाळ्यामामा यांनी केला असून शहरातील परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून अशीच असून नालेसफाई करणारे ठेकेदार ,पालिका कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार होत असून यावेळेस या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित उपायुक्त,आरोग्य विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी मी करणार आहे असा इशारा देखील खासदार खासदार बाळ्या मामा यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला.
नालेसफाईच्याया कामांचा आढावा घेतल्या नंतर म्हात्रे यांनी बुजूलाच असलेल्या भाजी मार्केट, मच्छी मार्केट मध्ये जाऊन येथील स्वच्छता व सोयी सुविधांची पाहणी केली.येथे प्रचंड अस्वच्छता असल्याने व महिलांसाठी स्वच्छता गृह नसल्याचे पाहून खासदार बाळ्या मामा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत लवकरात लवकर येथे स्वच्छता करण्याचे व सोयी सुविधा देण्याचे निर्देश दिले. AG.MS