तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल

 तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल

नाशिक, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. श्रीरामाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करु नका, तो कोणत्याही एका पक्षाचा नाही. पण तुम्ही जर तसं करत असाल तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, असं उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे म्हणाले, आज रामाचे मुखवटे घालून जे काही रावण फिरत आहेत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. काल तिकडे सर्व अंधभक्त जमले होते त्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांची बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण तिथं कोणीतरी एकानं म्हटलं की, आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान. अजिबात नाही, त्रिवार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. कारण आज तुम्ही तिकडं जे काही जाऊन बसलात ते केवळ तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणूनच. अन्यथा हे कोणाही येऱ्यागबाळ्याचं काम नाही.

म्हणूनच मी आज ठरवलंय की या मातीत ते तेज जन्माला आलं आहे. आज मोदी अयोध्येला गेलेत त्याआधी पंतप्रधान झाल्यानंतर कधी गेले नव्हते, त्यापूर्वी गेले असतील. पण मी शिवजन्मभूमीची माती घेऊन रामजन्मभूमीला गेलो होतो. मी २०१८ मध्ये नोव्हेंबरमध्ये गेलो होतो. तेव्हा थंड बस्त्यात पडलेला हा विषय होता तो अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत सुप्रीम कोर्टानं निकाल दिला कारण हा मी अयोध्येला नेलेल्या मातीचा महिमा आहे.

त्यावेळी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला त्यामुळं महाराष्ट्रानं देश वाचवला. औरंगजेबाला महाराष्ट्रानं मूठमाती दिली. जो जो महाराष्ट्रवर चाल करुन आला त्याला महाराष्ट्रानं मूठमाती दिली. पण आता रामाचे सगळे पुजारी म्हणाताहेत आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान. प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. पण तुम्ही जर असं करत असाल तर आम्हाला पण भाजपमुक्त जय श्रीराम करावं लागेल” असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ML/KA/SL

23 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *