आठवडी बाजारात चढवला मधमाशांनी लोकांवर हल्ला.

वाशिम, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील अमानवाडी येथील आठवडी बाजारात आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक लोकांच्या अंगावर हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेत मधमाशांनी चावा घेतल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
काल बुधवार हा अमानवाडी येथील आठवडी बाजाराचा दिवस होता. नेहमीप्रमाणे आसपासच्या खेडेगावांमधील व्यावसायिक आणि नागरिकांची बाजारात खरेदी विक्रीची लगबग सुरू असतानाच अचानक बाजारातीलच चिंचेच्या झाडावरील आग्या मोहोळाने बस्तान हलवून थेट नागरिकांवर हल्ला चढविला. यामुळे मोठी धावपळ झाली.
यावेळी तेथे असलेले टरबूज व्यापारी हरीश पवार तसेच हिरामण तायडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
गावातील काही नागरिकांनी गंभीर जखमींना गावातील डॉक्टरांकडे उपचारार्थ दाखल केले. हरीश पवार यांचा चेहरा व अंगात रुतलेल्या आग्या मोहोळाच्या माशांच्या डंखाचे शंभर ते दीडशे काटे काढल्याचे डॉ.लाहुडकर यांनी सांगितले.Bees attacked people in weekly market.
ML/KA/PGB
23 Mar. 2023