दुष्काळी बीडचा जिवंत गांडूळ थेट परदेशात

बीड, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीडला दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखले जाते, आता याच दुष्काळी बीडचा शेतकरी ,शेती बरोबरच गांडूळ खताची निर्मिती करून यातून वर्षाला 15 लाखाचा नफा कमवू लागला आहे. त्याच बरोबर बीडचा जिवंत गांडूळ देखील शेतकरी परदेशात पाठवत आहे. जिवंत गांडूळाची ही भारतातील पहिली निर्यात असल्याची माहिती पुढे आली आहे.
बीड जिल्ह्यातील छोटेसे गाव पारनेर येथील शेतकरी अमरनाथ अंदुरे हे रहिवासी आहेत. त्यांना 50 एकर जमीन आहे. ती जमीन त्यांनी दुसऱ्याला करायला दिलेली आहे. त्यातली पाच एकरच शेती सेंद्रिय पद्धतीने करतात. याच शेतात त्यांनी 100 आंब्याची झाडे लावलेली आहेत. त्याच बरोबर कोरफड देखील लावलेली आहे. यातून देखील ते चांगले पैसे कमावतात. शेतकरी अमरनाथ अंदुरे यांनी ऊसाची पाचट आणि लाकडापासून 40 बाय 25 साईजचा फक्त पाच हजार रुपयांत गोठा तयार केला आहे. याच गोठयात ते गांडूळ खताची निर्मिती करतात.
विशेष म्हणजे त्यांनी 5 टन जिवंत गांडूळ खत हा ओमान देशात पाठवला आहे. भारतातून यापूर्वी कोणीही जिवंत गांडूळ निर्यात केलेली नव्हती. ही पहिलीच निर्यात आहे. विशेष म्हणजे दुष्काळी बीड जिल्ह्यातून थेट परदेशात जिवंत गांडूळ निर्यात होत असल्याने ही देशासाठी मोठी संधी आहे.
2015-16 पासून शेतकरी अंदुरे हे गांडूळ खताची निर्मिती करतात. त्यांना तीन ते चार महिन्याला मजूर आणि जनावरांच्या शेणावर 50 हजार रुपये खर्च येतो. निर्मिती केलेल्या गांडूळ खतातून त्यांना वर्षाला 15 लाखांचा नफा होत आहे. तर वर्षाला 1 कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये गांडूळ खत तयार करता यावा आणि शेतकरी सेंद्रिय शेती कडे वळवा याच उद्देशाने गांडूळ खत निर्मिती सुरू केल्याची माहिती शेतकरी अमरनाथ अंदुरे यांनी दिली आहे
दुष्काळी बीडचा शेतकरी आता नवनवीन प्रयोग करून विकसनशील बनत आहे. तर आपल्या भारतातील शेतकऱ्यानी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले आहे. शासन स्तरावरून देखील मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ML/KA/PGB 13 Oct 2023