चारधाम मंदिरांच्या ५० मीटर परिसरात Reels बनवण्यावर बंदी
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी चारधाम यात्रा सुरु झाल्यापासून या धार्मिक ठिकाणांवर तुफान गर्दी उसळली आहे. यामध्ये भाविक कमी आणि युट्युबर, ब्लॉगर यांची संख्याच जास्त असल्याचे पहायला मिळत आहे. चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची गर्दी हे प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी मंदिराच्या ५० मीटर परिसरात भाविकांना रील्स आणि व्हिडीओ बनवता येणार नाही, असा आदेश जारी केला आहे.
याआधी चारधाम येथील व्हिडीओ शूटिंगवरील आक्षेपांबाबत राज्य सरकारची भूमिका २४ तासांत दोनदा बदलली. प्रथम मुख्य सचिव राधा रातुरी यांनी सांगितले की, मंदिरांच्या २०० मीटर परिसरात व्हिडिओ किंवा रील्स बनवल्या जाणार नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर निवेदनात २०० मीटरऐवजी ५० मीटर त्रिज्या लिहिण्यात आली. काल केदारनाथमध्ये २८ हजार, बद्रीनाथमध्ये १२,२३१ यमुनोत्रीमध्ये १०,७१८ आणि गंगोत्रीमध्ये १२,२३६ लोकांनी दर्शन घेतले. आतापर्यंत ३.९८ लाख लोकांनी चारहीधामांना भेटी दिल्या आहेत.
दरम्यान, काल दिवसभर उत्तरकाशी ते गंगोत्री या ९९ किलो मीटर मार्गावर आणि बरकोट ते यमुनोत्री या ४६ किलो मीटर मार्गावर तब्बल ३ हजार वाहने १२ ते १५ तासांची वाट पाहत रहदारीत रांगत राहिली. यमुनोत्री महामार्गावरील पालीगडजवळ सर्वात मोठी समस्या कायम आहे. येथे १२ तास वाहने थांबवली जातात. रस्ते अरुंद असून मोटारींचा भार जास्त असल्याने बुधवारी रात्रभर वाहतूक सुरूच होती. प्रवाशांनी वाहनातच रात्र काढली.
SL/ML/SL
17 May 2024