B.H.A.R.A.T. ही आद्याक्षरे वापरून I.N.D.I.A. आघाडीसाठी शशी थरूर यांनी सुचवले नवीन नाव

नवी दिल्ली,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाला INDIA संबोधावे की भारत यावरून सध्या देशभर चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात यावरुन गदारोळ सुरू आहे. वास्तविक पाहता भारतीय राज्यघटनेत इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे कायदेशीरपणे स्विकारलेली आहेत, तरीही देशाच्या नावाविषयी राजकीय फड रंगवून परस्परांना पासचितपट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधी पक्ष करत आहेत. समाज माध्यमांवरही याबाबत तुंबळ शाब्दीक युद्ध सुरू आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढा काळ INDIA हे नाव सर्रास वापरले जात आहे. मात्र आता विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया (I.N.D.I.A) आघाडीला शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वातील सरकारने भारत हे नाव पुढे केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आता भारत (BHARAT) हे आद्याक्षर वापरून विरोधकांच्या आघाडीचे नाव सुचवले आहे.
शशी थरूर यांनी ‘एक्स’वर (आधीचे ट्वीटरवर) पोस्ट करताना म्हटले की, आम्ही आमच्या आघाडीला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मोनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT) ) असे म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष नावे बदलण्याचा हा खेळ थांबवतील असे थरूर यांनी म्हटले.
याआधीदेखील भारत की इंडिया या वादावर थरुर यांनी आपले मत व्यक्त केले होते. थरुर यांनी म्हटले की, इंडिया या नावाचे एक मूल्य आहे. सरकार हे नाव वगळण्याचा मुर्खपणाचा निर्णय घेऊ शकत नाही, अशी अपेक्षा आहे. भारत या नावाला आपला आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मल्ल्याळम आणि हिंदी भाषिक दैनिकांमध्ये भारत याच शब्दाचा वापर होतो. इंडिया आणि भारत ही दोन्ही यापुढेही कायम ठेवावीत अशी अपेक्षाही खासदार थरूर यांनी व्यक्त केली.
SL/KA/SL
6 Sept. 2023