अवकाळी पावसामुळे
जळगावात ७ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका

जळगाव दि ८– जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून यात शेतकऱ्यांचे, पशुपालक आणि अनेक गावामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरणाचे विजेचे खांब पडून अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला असून प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामाचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
आज जळगाव तालुक्यातील अनेक गावात नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे १० तालुक्यातील ३२० गावातील ७ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकाला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. जळगाव, चाळीसगाव व चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेला आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी आज विमा कंपनीची बैठक देखील या संदर्भात घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
ML/MS