आंबेडकरी विचार समाज तोडण्याचा नाही तर जोडण्याचा विचार – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
महाड, दि २०- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन या देशातील सर्व समाज घटकांना; सर्व समाजाला जोडले आहे. त्यामुळे आमचा विचार हा तोडण्याचा नाही तर समाज जोडण्याचा विचार आहे. चवदार तळे ही समतेची क्रांतीभूमी आहे. संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा चवदार तळे सत्याग्रह आहे. या ऐतिहासिक चवदार तळे आणि परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने चवदार तळे विकास प्राधिकरण स्थापन केले पाहिजे. महाड ही क्रांती भूमी आहे या क्रांती भूमीतील 30-40 एकर जागा संपादित करुन भव्य शिवसृष्टी आणि भिमसृष्टी निर्माण केली पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 55 कोटी खर्चाच्या चवदार तळे जलशुध्दीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते.
चवदार तळे सत्याग्रहाचा 99 वा वर्धापन दिन असून चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी महोत्सवाला आजपासुन सुरुवात झाली. चवदारतळे जलशुद्धीकरण प्रकल्प भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनिल तटकरे, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, माजी खासदार धैर्यशील पाटील , आमदार प्रविण दरेकर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर, भदंत राहुल बोधी महाथेरो, समाज कल्याण सचिव हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंढे, जिल्हाधिकारी किशन जावळे ; जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड; प्रकाश मोरे सिद्धार्थ कासारे गोपीनाथ सोनवणे; मोहन खांबे सुमित मोरे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
या सोहळ्यास माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते मात्र त्यांनी या सोहळ्यास पाठ दाखविली. प्रकाश आंबेडकर या सोहळ्यास गैरहजर राहिल्याचे पाहून ना .रामदास आठवले यांनी पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचे आवाहन केले.प्रकाश आंबेडकर यांची ताकद आणि माझी ताकद एकत्र आली तर समाजाची राजकीय ताकद वाढेल.समाजाच्या हिता साठी समाजाचे रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनि केले.KK/ML/MS