भारत तयार करणार कृत्रिम हिरा
कानपूर,दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत दुर्मिळ, मौल्यवान आणि त्यामुळेच अतिशय महागड्या वस्तूंमध्ये अग्रस्थानी असलेला हिरा कृत्रिमरित्या तयार करण्याचे प्रयत्न जभरात सुरू आहेत. यामध्ये आता भारताचाही सहभाग असणार आहे. आयआयटी कानपूर या संस्थेने कृत्रिम हिरा तयार करण्याचे हे अवघड आव्हान स्वीकारले आहे. याबाबतचा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवण्यात आला आहे. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कृत्रिक हिरे निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
कोण करणार कृत्रिम हिऱ्याची निर्मिती
कानपूर आयआयटीचे संचालक अभय करंदीकर यांनी आपल्या संस्थेतील शास्त्रज्ञांचा गट कृत्रिम हिरा (Lab Grown Diamond) बनवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. हे लक्षात घेऊनच केंद्राकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजुर झाल्यास सरकार या संशोधनासाठी आवश्यक रक्कमेची तरतूद करेल असेही करंदीकर यांनी नमूद केले आहे.
खाणींमधुन हिरा काढणे, त्यावर प्रक्रीया करणे या सर्वच खर्चिक आणि अवघड बाबी असतात. त्यामुळे हिऱ्यांची किंमत नेहमीच लाखोंच्या घरात जाते. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या हिरा तयार करणे शक्य झाल्यास त्याची किमत आत्तापेक्षा कमी राहील आणि सर्वसामान्यांनाही हिरा खरेदीचे स्वप्न प्रत्यक्षात आणता येईल.
SL/KA/SL
2 Feb. 2023