आमदार अनिल बाबर अनंतात विलीन 

 आमदार अनिल बाबर अनंतात विलीन 

सांगली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील गार्डी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. अनिल बाबर यांचे पुत्र अमोल आणि सुहास यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांच्या घरी जावून अनिल बाबर यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचं सांत्वन केले.

कमी बोलणारा पण ज्यास्त काम करणारे नेते होते. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली . ते पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य लोकांसाठी किती मोठ काम करू शकतो, हे अनिल बाबर यांनी दाखवून दिले आहे.
माणूस किती जगाला या पेक्षा कसा जगला हे महत्वाचं असते. दुष्काळी भागाच्या जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे उर्वरित काम पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

 यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्लक मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समवेत राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील शेकडो मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. बाबर यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबर हे 74 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विटा खानापूर मतदार संघातून अनिल बाबर हे चार वेळा निवडून आले आहेत. अनिल बाबर यांच्या विटयातील घराजवळ त्यांचे प्रार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरापासून अंतिम यात्रा काढण्यात आली.

शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव आमदार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी त्यांच्यासोबत आणि अनिल बाबर हे खंबीरपणे राहिले. गार्डी गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य, सभापती, सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.

टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी आटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांच्या फार मोठा वाटा आहे. नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांच्यासाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती.
बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा राहिला आहे. त्यांनी खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते. त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती. बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

ML/KA/SL

31 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *