अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण

लंडन, दि. २० : यावर्षीपासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस अँडरसन-तेंडुलकर असे नाव देण्यात आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या योगदानाबद्दल इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) हा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. अखेर काल लॉर्ड्स येथेच तेंडुलकर व अँडरसनच्या उपस्थितीत या करंडकाचे अनावरण करण्यात आले.
ईसीबीने त्यामुळे २००७पासून देण्यात येत असलेले पतौडी हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. २००७पासून भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेस मन्सूर अली खान पतौडी यांच्या स्मरणार्थ ‘पतौडी’ असे नाव देण्यात येत होते. पतौडी यांनी वयाच्या २१व्या वर्षी भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र आता ईसीबीने तेंडुलकर-अँडरसन असे नाव ट्रॉफीला दिले आहे. मात्र पतौडी यांचे नाव मालिकेशी निगडीत असावे असे तेंडुलकरने स्वत: ईसीबीला सुचवले. त्यामुळे आयसीसीशी संवाद साधल्यानंतर ईसीबीने आता या कसोटी मालिकेतील विजेत्या खेळाडूंना पतौडी पदक देऊन गौरविण्यात येईल, असे सांगितले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि पतौडी यांच्या पत्नी शर्मिला टागोर यांनी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत टीका केली होती.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीतील चौथ्या दिवशीच ट्रॉफीचे अनावरण करण्यात येणार होते. तसेच नाव बदलण्याचीही अधिकृत घोषणा होणार होती. मात्र अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमुळे हे टाळण्यात आले. तसेच मालिका संपल्यावर विजेत्या खेळाडूंना पतौडी पदकाचे वितरण केले जाईल, असे ईसीबीने स्पष्ट केले.
भारतीय संघ या मालिकेत एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार असला, तरी आपण नक्कीच चमकदार कामगिरी करू. भारतीय संघ ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकू शकेल, असे भाकीत तेंडुलकरने वर्तवले आहे. तसेच कर्णधार गिलने कोणी त्याच्याविषयी काय बोलत आहे, याचा विचार न करता स्वत:च्या निर्णयावर ठाम रहावे, असेही तेंडुलकरने सुचवले आहे. गिल या कसोटीत चौथ्या स्थानी फलंदाजी करणार आहे. एकेकाळी सचिनही त्याच स्थानी फलंदाजी करायचा.