सरकार विरोधी असल्याच्या आरोपामुळे अमरावती विद्यापिठाने अभ्यासक्रमातून वगळली कादंबरी
अमरावती, दि. ४ : लेखक पवन भगत लिखित ‘ते पन्नास दिवस’ ही संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या अभ्यासक्रमात असलेली कादंबरीवर ती भाजप सरकार विरोधी असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर आता विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली आहे. कोरोना काळावर आधारित ही कादंबरी सरकारच्या विरोधात भाष्य करते, असं सांगत काही भाजपसमर्थक प्राध्यापकांनी ती हटवण्यासाठी प्रयत्न केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले,
” ही कादंबरी बहुमताने अभ्यासक्रमातून हटवण्यात आली आहे. कोरोना काळात जी स्थिती झाली होती, तिचं वर्णन करत असताना वापरलेली प्रतिमा, प्रतिकं आणि त्या प्रतिमांमुळे एका विशिष्ट समुदायावर, जातीवर, धर्मावर जे काही लिखाण होतं, ते एककल्ली होतं.”
“त्यामधून वेगळ्या पद्धतीच्या अडचणी निर्माण होऊन समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जाती-धर्माच्या आधारावर मनभेद होऊ नयेत, यासाठी बहुमताने कादंबरी अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला,” असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
या संदर्भात कादंबरीचे लेखक पवन भगत म्हणाले, “मला असं वाटतं की, ही एकप्रकारे अघोषित आणीबाणी आहे. लेखनस्वातंत्र्यावर गदा येणं आणि सेन्सॉरशीप करणं उचित नाही. ही कादंबरी अभ्यासक्रमाला लावा, असा कसलाही अर्ज मी विद्यापीठांना कधीही केलेला नाही. विद्यापीठानेच हे पुस्तक स्वीकारलं होतं.”
SL/ML/SL