अन्यथा आम आदमी पार्टी मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरेल,
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी करामध्ये ७.१२ टक्क्यांनी केलेली वाढ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अन्यायकारक आहे. ती त्वरित रद्द करण्यात यावी,अन्यथा आम आदमी पार्टी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबई महापालिका प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला.
मुंबईकरांना मुंबई महापालिकेतर्फे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर लागणाऱ्या पाणीपट्टी करामध्ये ७.१२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे. जून २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाप्रमाणे पाणीपट्टीत वाढ करण्यात येणार आहे. अगोदरच इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी यांसारख्या समस्यांमुळे मुंबईकर आणि गरीब जनता त्रस्त असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी करवाढ करण्याचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय अन्यायकारक आहे. त्याचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करते.
खर तर मुंबईकरांना मुबलक आणि स्वच्छ पाणी मोफत मिळाले पाहिजे कारण मुंबई महानगर पालिका फायद्यामध्ये आहे. आशियातील सर्वात मोठी महानगर पालिका असून सुमारे 46000 करोड बजेट आहे. करोडो रुपये अनामत रक्कम( Fix Deposit) म्हणून अनेक वर्षे बँकेत आहेत. तरी सुद्धा मुंबईकरांवर हा आर्थिक बोजा कशाला ? पाणीगळती, तुटलेल्या पाइपलाइन्स, पाणीमाफिया समस्या तर आधीपासूनच आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. कित्येकवेळा महापालिका अधिकारी आणि पाणीमाफिया यांचे साटेलोटे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. याला आळा घालण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश आलेले आहे. असे असताना जून महिन्यापासून पूर्वलक्षी प्रभावाने मुंबईकरांच्या डोक्यावर या वाढीव पाणीपट्टी करवाढीचा बोजा कशासाठी ? असा सवाल ही आपने उपस्थित केला.
मुंबई महानगर पालिकेचा उपक्रम असलेला बेस्ट प्रशासनाने दोन महिन्याच्या मासिक बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम भरण्याचे पत्र पाठवून वीज ग्राहकांना शॉक दिला आहे. बेस्टच्या विद्युत विभागाच्या या पत्रानंतर वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
बेस्टच्या विद्युत विभागाकडून मुंबईत सुमारे 10 लाख 80 हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यामध्ये 8 लाख 50 हजार निवासी ग्राहक आणि 2 लाख 30 हजार व्यावसायिक ग्राहक आहेत. या महिन्यामध्ये बेस्टकडून पाठविण्यात येणाऱ्या बिला सोबत दोन महिन्याचे सुरक्षा अनामत रक्कम भरण्याचे पत्रक ही पाठवले आहे. ही रक्कम या महिना अखेर पर्यंत भरण्यास सांगितले आहे. याचा आम्ही विरोध करत आहोत.
बुधवारी, 28 डिसेंबर रोजी बेस्टच्या कुलाबा येथील मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढणार येणार आहे .बेस्ट प्रशासनाने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत केली.
आजच्या पत्रकार परिषदेला मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन-शर्मा व कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास व संदीप कटके उपस्थित होते.
ML/KA/PGB
26 Dec 2022