आलू बंजारा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
लागणारे जिन्नस:
७-८ गोल, छोटे-छोटे बटाटे (आधीच सालं काढून, टोचून, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे),
१ वाटी बारीक चिरलेला शेपू, १ वाटी रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर, १ कांदा उभा चिरलेला,
२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबिर, ठेचलेले आले+लसूण १ चमचा, २ सुक्या लाल बेडगी मिर्च्या,
१ चमचा लाल तिखट (काश्मिरी मिर्चीचे तिखट…रंग छान येतो भाजीला), अर्धा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे+जिरे पूड, चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार मीठ, चिरलेला अर्धा टोमॅटो आणि छोट्या लिंबा एवढा गूळ.
क्रमवार पाककृती:
ही भाजी मातीच्या भांड्यात करायची आहे. तेव्हा, बाजारातून (जिथे माठ, मातीच्या कुंड्या मिळतात त्यांच्याकडून) आधीच एक कॅसेरॉलच्या आकाराचे मातीचे भाजलेले भांडे (तुळतुळीत पॉलिश्ड दिसते हे भांडे) आणि त्यावर मातीचेच झाकण असा सेट आणून ठेवावा.
मातीचे भांडे स्वच्छ धुवून कोरडे करून गॅसवर ठेवावे. त्यात अर्धी पळी तेल घालून मंद आचेवर ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात आले+लसूण ठेचा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.
नंतर चिमूटभर हिंग टाकून त्यात लाल मिर्च्यांचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणे+जिरे पूड आणि गरम मसाला वगैरे जिन्नस टाकावे.
त्यावर चिरलेला कांदा टाकावा (कांदा गुलाबी होईपर्यंत परतण्याची गरज नाही).
नंतर चिरलेला शेपू, सोललेले बटाटे आणि भिजवलेले मसूर टाकून एकदा सगळे मिश्रण परतून घ्यावे.
नंतर सगळे मिश्रण बुडून वर एक इंच राहील इतके पाणी टाकावे.
चवीनुसार मीठ टाकावे. चिरलेली कोथिंबिर टाकावी.
मिश्रण व्यवस्थित ढवळून त्या भांड्यावर मातीचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावे.
बटाटे आणि मसूर ब-यापैकी शिजल्यावर, चिरलेला टोमॅटो आणि गूळ घालावा.
पुन्हा एक वाफ येऊ द्यावी.
ML/ML/PGB
1 Jan 2025