उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप

उत्तरकाशी, दि. ६ : उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावात काल खीरगंगा नदीच्या उगमस्थानी अचानक आलेल्या जलप्रलयामुळे (flood) हांहाकार माजला. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील ५१ पर्यटक अडकले आहेत. ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली. यामध्ये नांदेडचे ११, सोलापूरचे ४ आणि इतर जिल्ह्यातील ३६ पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय बचावपथकाला अजून एक मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे तर ६० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.आतापर्यंत १९० लोकांना वाचवून त्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.एसडीआरएफ, एनडीआरएफ, सैन्य दल आणि आयटीबीपी पथक सध्या घटनास्थळी मदत कार्य करत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराली आणि हर्षिल येथील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, धाराली गाव संपूर्णपणे बाधित झाले आहे. कालच्या घटनेनंतर अनेक टप्प्यांत चिखल-गाळ जमा झाला आहे. मी आज तेथे जाऊन लोकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या आपत्तीत सर्वकाही नष्ट झाले आहे.संध्याकाळपर्यंत लष्कराच्या जवानांनी सुमारे १९० लोकांचा बचाव करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सध्या बचावकार्य सुरू आहे आणि त्यांना उत्तरकाशीमध्ये आणले जात आहे.संपूर्ण जोडरस्ता अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे पूर्णतः बाधित झाला आहे. सरकार त्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पंतप्रधानांनीही शक्य त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे. ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या सुमितने सांगितले की ,या आपत्तीने लोकांना पळून जाण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. अनेक लोक बेपत्ता आहेत आणि कदाचित त्यांचा मृत्यू झाला असावा.
SL/ML/SL