पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची जामिनावर सुटका

बंगळुरु, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींपैकी कोठडीत असलेल्या एका आरोपीला काल बंगळुरु न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे या हत्या प्रकरणातील सर्वच १७ आरोपी आता जामिनावर बाहेर आले आहेत. बंगळुरु न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीधर पै बी यांनी काल शरद भाऊसाहेब काळस्कर याला जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींची नावे असल्याचे निश्चित केले होते. त्यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर विकास पाटील हा आरोपी अद्याप फरार आहे.
काळस्कर याने आपण निर्दोष असून आपला या प्रकरणात काहीही सहभाग नसल्याचे जामीन अर्जात म्हटले होते. इतर आरोपींना जामीन मिळाला असल्याने आपल्यालाही जामीन मिळावा, अशी मागणी त्याने केली होती. फिर्यादी पक्षाने त्याच्या जामिनाला विरोध केला होता. त्याला जामिनावर सोडल्यास तो इतरही गुन्हे करू शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. तो अमान्य करत न्यायालयाने इतर आरोपींना जामीन मिळाला आहे, या आधारावर त्याला जामीन मंजूर केला.
कोण होत्या गौरी लंकेश
गौरी लंकेश या बंगळूरच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी लंकेश पत्रिकें ह्या साप्ताहिकामध्ये संपादक म्हणून काम केले, जे त्यांचे वडील पी. लंकेश यांनी सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी गौरी लंकेश पत्रिके ह्या नावाने स्वतःचे साप्ताहिक चालवले.५ सप्टेंबर २०१७ रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी राजराजेश्वर नगरातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून त्यांची हत्या केली. मृत्यूपूर्व काळात त्यांनी हिंदू जहालमतवादी लोकांवर टीका केली होती. त्या आधीही गौरी लंकेश यांनी हिंदुत्ववादी आणि जातीयवादी विचारांच्या संघटनाच्या विरुद्ध अनेक प्रकारे लिखाण करून आवाज उठवला होता