पुढील वर्षापासून राज्यभरात विमानसेवा सुरू

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्या मुंबई विमानतळावरून वेळा मिळणं कठीण आहे मात्र नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील वर्षी तयार झाल्यावर ही सेवा सुरू केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर दिली.
राज्यात ३२ विमानतळे आहेत त्यातील ११ वरून वाहतूक सध्या होऊ शकते मात्र मुंबईत वेळ उपलब्ध नसल्यानं केवळ रस्ते आणि रेल्वे मार्गेच प्रवास करावा लागतो असा मुद्दा अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला होता. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडे असणारी पाच विमानतळे ती कंपनी दिवाळखोरीत गेल्यानं ताब्यात घ्यावीत अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. या कंपनीची थकबाकी त्यांच्याकडून नंतर वसूल करण्याच्या बोलीवर राज्य सरकार सध्या ती भरून त्यांच्याकडील सगळी विमानतळे ताब्यात घेईल असं फडणवीस म्हणाले.
शिर्डी येथील विमानतळ रात्र उड्डाणासाठी तयार झाला आहे त्याची कायमस्वरूपी परवानगी मिळवली जाईल आणि तिथे साडे सहाशे कोटींची नवीन टर्मिनल इमारत बांधण्यात येत आहे अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली, बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात heliport तयार करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे, ही समिती त्यासाठी योग्य जागा शोधून देईल त्याठिकाणी पुढील कारवाई लगेच केली जाईल अशी माहिती देखील फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रश्नावर दिली.
ML/KA/SL
21 July 2023