अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक

मुंबई दि.१२ : – अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव देखील बदलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अधिसूचना जारी करून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘अहिल्यानगर रेल्वे स्थानक’ असे केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे यासाठी प्रयत्नशील होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यातच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र पाठवून रेल्वे मंत्रालय आणि त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे करण्याबाबत विनंती केली होती आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर असे केल्यानंतर येथील रेल्वे स्टेशनचे नाव देखील बदलण्यात यावे, अशी मागणी अनेक संस्था,संघटना आणि नागरिकांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आपण त्रिशताब्दी जयंती वर्ष साजरे करत असताना रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याबाबत निर्णय झाल्याचा विशेष आनंद आहे.येत्या काळात लवकरच औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक’ असे होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.ML/ML/MS