पाच वर्षांनंतर ‘नथुराम’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, वाद काही थांबेना
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या दमदार अभिनयामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेले आणि संवेदनशील विषयामुळे वारंवार वादात सापडणारे नथुराम गोडसेच्या आयुष्यावर आधारित शरद पोंक्षे लिखित ‘हे राम नथुराम’ हे नाटक ‘नथुराम गोडसे’ या नावाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी भेटीला आले आहे. ७ ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या या नाटकाचे २६ जानेवारी पर्यंत ५० प्रयोग राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत. मात्र माऊली प्रॉडक्शन्सचे उदय धुरत यांनी या नाटकाच्या नावाचा आपल्याकडे कॉपीराईट असल्याचा दावा केल्याने हे नाटक पुन्हा एकदा वादात सापडले आहे.
याबाबत या नाटकाचे लेखक आणि अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उदय धुरत यांनी केलेला दावा धादांत खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, ” रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड आग्रहामुळे पाच वर्षांपूर्वी बंद केलेल्या या नाटकाचे ५० प्रयोग आम्ही राज्यभर करणार आहोत. उदय धुरत यांच्याकडे नथुराम गोडसे या नावाच्या कोणताही कॉपीराईट नाही. त्यांचा धादांत खोटा आहे. सध्या राज्यभरातील सर्व प्रयोग हाऊसफुल झाले आहेत. रसिक प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचावे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे कायदेशीर वाद घालण्यात मला अजिबात स्वारस्य नाही. नाटकाचा निषय लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे.”
२०१६ मध्ये शरद पोंक्षे लिखित ‘नथुराम गोडसे’ या नाटकाच्या नावावर उदय धुरत यांनी कॉपीराईटचा दावा केला होता. तेव्हा त्यांना सेन्सॉरने नोटीस पाठवून १५ दिवसांचा आत कॉपीराईटचे पुरावे सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र अद्याप त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. मात्र त्यानंतर जेव्हा जेव्हा या नाटक नाट्यगृहात दाखल होते तेव्हा धुरत यामध्ये कायदेशीर अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नाटकाच्या नावाच्या कायदेशीर वादात रेंगाळत राहण्यापेक्षा २६ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ५० प्रयोगांद्वारे अधिकाधीक रसिकांपर्यंत नाटक पोहोचवणारा असल्याचे पोंक्षे यांनी स्पष्ट केले आहे.
२६ जानेवारी २०२४ नंतर मात्र हे नाटक कायमसाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचेही पोंक्षे यांनी आवर्जून नमूद केले.
SL/KA/SL
20 Oct. 2023