जाहिरात गुरु पीयूष पांडे यांचे निधन

 जाहिरात गुरु पीयूष पांडे यांचे निधन

मुंबई, दि. २४ : भारतीय जाहिरात क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पीयूष पांडे (७०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जाहिरात विश्वात शोककळा पसरली असून, एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पीयूष पांडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पीयूष पांडे यांनी ओगिल्वी इंडिया या आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेत चार दशके काम करत भारतीय जाहिरात क्षेत्राला नवी दिशा दिली. १९८२ मध्ये अवघ्या २७ वर्षांच्या वयात त्यांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला आणि इंग्रजी प्रभुत्व असलेल्या या क्षेत्रात हिंदी आणि स्थानिक भाषांमधून प्रभावी जाहिराती सादर करून क्रांती घडवली. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, ‘हर घर कुछ कहता है’, ‘कुछ खास है’, ‘अबकी बार मोदी सरकार’ यांसारख्या अनेक गाजलेल्या जाहिरात मोहिमांमुळे ते घराघरात पोहोचले.

त्यांनी अमिताभ बच्चन, एम. एस. धोनी, सुप्रिया पाठक यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत काम केले. त्यांच्या आवाजातील जाहिरातींनी लोकांच्या मनात घर केले. गुजरात पर्यटन, पोलिओ निर्मूलन, अमूल, फेविकॉल, एशियन पेंट्स यांसारख्या ब्रँड्सना त्यांनी एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या कार्यामुळे भारतीय जाहिरात क्षेत्राला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.

त्यांच्या निधनानंतर अनेक उद्योगपती, कलाकार आणि जाहिरात क्षेत्रातील सहकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. सोहेल सेठ यांनी त्यांना “जीनियस आणि सच्चा देशभक्त” असे संबोधले. मुंबईत सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या जाण्याने भारतीय जाहिरात क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे. पीयूष पांडे हे केवळ जाहिरात गुरु नव्हते, तर ते भारतीय भावनांचा आवाज होते. त्यांच्या आठवणी आणि कार्य भारतीय जाहिरात क्षेत्रात सदैव प्रेरणादायी ठरतील. Advertising guru Piyush Pandey passes away
SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *