“औरंगजेब क्रूर नव्हता” म्हणणे भोवले, अबू आझमींचं निलंबन

 “औरंगजेब क्रूर नव्हता” म्हणणे भोवले, अबू आझमींचं निलंबन

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली. ५ मार्चला विधानसभेत भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी निलंबित आमदार असणार आहेत. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्यानंतर अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं

हिंदवी स्वराज्याच्या मुळावर उठलेल्या , छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह समस्त हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्या आणि संभाजी महाराजांना इस्लाम धर्म न स्वीकारल्याने हालहाल करून ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा बादशाह औरंगजेब याची उत्तम प्रशासक म्हणून भलावण करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांना भारी पडले असून त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधी साठी निलंबित करण्यात आल्याचा ठराव आज विधानसभेत एकमताने मात्र प्रचंड गदारोळात मंजूर करण्यात आला.

काल सभागृहात याच विषयावरून सत्तारूढ सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते, त्यांनी मोठा गदारोळ करून अनेकवेळा दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले होते, त्यानंतर दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली होती. आज विधानकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझमी यांना अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात सादर केला.

या प्रस्तावाला सत्तारूढ बाजूने विशेषतः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचंड विरोध करत आझमी यांना इतकी कमी शिक्षा का असा सवाल उपस्थित केला. अनेक दाखले देत त्यांनी आझमी यांना कायमस्वरूपी निलंबित करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे, आम्ही आमच्या महाराजांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र याआधीच्या एका प्रकरणात कोणालाही एका अधिवेशन कालावधीपेक्षा जास्त निलंबित करता येत नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने हा प्रस्ताव आणल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्यावर विरोधी बाजूने विजय वडेट्टीवार यांनी आमचा याला पाठिंबा आहे मात्र महाराजांचा अपमान करणाऱ्या अन्य लोकांनाही हाच न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत त्यांना पाठिंबा दिला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तारूढ सदस्य जास्त आक्रमक झाले, ते जागा सोडून पुढे आले, घोषणाबाजी सुरू झाली सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळातच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मताला टाकला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर ही झाला. यामुळे आता आझमी यांना या अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसरात येण्यास ही बंदी घालण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *