बोधबोडन गावाने टाकली कात ! 2020 पासून एकही आत्महत्या नाही.

यवतमाळ दि. २७ (आनंद कसंबे) : यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन हे गाव संपूर्ण जगभर कुप्रसिद्ध झालं ते शेतक-यांच्या आत्महत्यांसाठी. 2003 ते 2020 पर्यंत अडीच हजार लोकसंख्या असलेल्या बोथबोडन गावातील 29 शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या .हे गाव इतकं प्रसिद्ध झालं होतं की तिथे योगगुरु श्री श्री रविशंकर महाराज यांच्यापासून तर राहुल गांधी , सोनिया गांधी पासून नितीन गडकरी पर्यंत सारख्या सर्वच नेत्यांनी भेटी दिल्या होत्या. यानंतर मात्र शासन – प्रशासन खडबडून जागे झाले.
आत्महत्यांचा सूक्ष्म अभ्यास केला गेला. तेव्हा नापिकी आणि कर्जबाजारीपणा ही कारणे पुढे आली. अर्थातच नैराश्य निर्माण होते. परिणामी शेतकरी आत्महत्या करतात हा निष्कर्ष निघाला. तेव्हा शासनाने आणि काही कर्तुत्वान शेतक-यांनी यावर विशेष लक्ष केंद्रित केलं . शेतक-यांना मुख्य अडचण असते ती सिंचनाची. कारण सिंचन नसेल तर पावसाळयात वर्षातुन एक पिक घ्यायच आणि मिळेल त्यावर समाधान मानायच.साहजिकच पाऊस अत्यंत कमी पडला तरी आणि खुप जास्त पडला तरीही पिक हाती नाही यायचे.
यासाठी बारमाही सिंचन गरजेचे होते.परिसरात तलाव होतेच परंतु पाणी उपसा करण्याची सोय नव्हती , हे पाहता कृषी विभागाने मोटार पंप , ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा योजना शंभर टक्के अनुदानावर दिल्या. यातून अनेक शेतक-यांची शेती बारमाही सिंचनाखाली आली.यातुन गहू , चणा पालेभाज्या अशी पिके शेतकरी घेउ लागले. तर कापूस, सोयाबीन, तूर इत्यादि पिकांनाही पावसाळा संपल्यावर पाणी देण्याची व्यवस्था झाली.

साहजिकच पीक उत्पादनात वाढ झाली.याच सोबत जोड धंदा म्हणुन शेतकरी पॅकेज अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येक शेतक-याला 2-2 म्हशी आणि 2-2 गायी 75 टक्के अनुदानावर देण्यात आल्या. मिळालेल्या योजनांचा रितसर लाभ घेत शेतक-यांनी दुग्ध व्यवसायात वाढ केली. आज या गावातून एक हजार लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन होत आहे. उत्पादीत दूध शेतकरी यवतमाळला विक्रीसाठी नेऊ लागले.
यातून संसाराला मोठा आधार मिळाला.परिणामी शेतक-यांचे नैराश्य दूर होण्यास मदत झाली. पाहता पाहता बोथबोडन गावातील आत्महत्या थांबायला लागल्या.सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणजे 2020 पासुन येथील आजपर्यंत एकाही शेतक-याने आत्महत्या केली नाही. शासनाच्या योजनांचा रितसर लाभ घेत, शेतीला कष्टाची जोड दिली. आणि पाहतापाहता गावाचं रूपडे बदललं आहे . एकूणच यवतमाळ तालुक्यातील बोधबोडन गावाने आता कात टाकली असून येथे आत्महत्या नव्हे तर आता समृद्धीचे पीक येथील शेतकरी घेत आहे अस आपण अभिमानाने म्हणू शकतो !
ML/ML/SL
27 Dec. 2024