मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठे षडयंत्र
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे. पिण्याची पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारचे मोठया प्रमाणात दुर्लक्ष झाले. यामागे मोठं षडयंत्र आहे. तसेच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने डाव रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मतदानापूर्वी भाजप आणि गद्दार उमेदवारांनी पैसे वाटप केले. भांडुप मध्ये अशी घटना उघड झाल्यावर राज्याचे गृहमंत्री तेथे पोहचले होते, अशी माहिती दानवे यांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाई लावली. राज्याच्या निवडणूक आयोगांबाबत अशी स्थिती असल्यास सामान्य माणसाचे काय झाले असेल, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली का करण्यात आली? सत्ताधाऱ्यांना मदत करण्याची भूमिका निवडणूक आयोग आणि पोलिसांनी घेतली आहे का? याबाबत निःपक्षपातीपणे उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
विद्येचे हब असलेल्या पुण्याची ओळख होतेय पबचे पुणे
पुण्यातील अपघात दुर्घटनेत पुणे पोलीस आयुक्तांनी ३०४ कलम लावायला हवं होतं मात्र त्यांनी मुद्दाम ३०४ ए कलम लावलं, याबाबत चौकशी करावी, तसेच विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून पुणे येथे मोठया प्रमाणात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येत असतात. त्यांना या पब मालकांकडून मद्यपान करण्याचं पॅकेज पुरविले जातेय.पुण्यातील हायफाय रहिवासी वसाहत असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात पब सुरू आहेत. विद्येचे हब म्हणून ओळ्ख असलेल्या पुण्याची ओळख पबचे पुणे होऊ लागली असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली.
ML/ML/SL
22 May 2024