गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे बुजवले जाणार

मुंबई, दि. २२ : गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईचे सगळे खड्डे बुजवण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. मुसळधार पावसामुळं इंदिरानगर येथून सुरु होणाऱ्या वाकोला ब्रिजवरही खड्डे निर्माण झाले आहेत. हा पूल एमएमआरडीएने बांधलेला आहे तरी देखील यावर अनेक खड्डे लोकांना त्रासदायक ठरत असल्याने खड्डे बुजवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.
मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. एबीपी माझा ने आज याच मुंबईतील खड्ड्या संदर्भात रियालिटी चेक केली होती. मुंबईतील खड्डे बुजविण्याचे काम आता जलद गतीनं सुरु करण्यात आलं आहे.
मुंबईच्या अंधेरी, भांडुप, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, वांद्रे बस स्थानक, परळ, दादर, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, चारकोप, मालाड या भागात सर्वाधिक खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिका मास्टिक अस्फाल्टचा वापर करणार आहे. पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा घाट घातला. परंतु केवळ 49.07 टक्के रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून करण्यात येणार आहेत. दरम्यान, काँक्रीटीकरण केल्यानंतरही रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’चीच आहे. तर पालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे अॅप विकसित केले असून या अॅपवर नागरिकांच्या तक्रारीचा पाऊस पडत आहे.
SL/ML/SL