विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मिळाले यश

मुंबई, दि. ९ : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढत भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज सरकारनचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट दिली आणि सरकारतर्फे सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. तसेच अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील, असे महाजन यांनी सांगितले.
गिरीश महाजन म्हणाले की, आमची भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामान्य कुटुंबातील आहात. तुमची रोजीरोटी ही आहे, त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय फडणवीसांनी त्यावेळी घेतला. त्यानुसार, 20 टक्के, 40 टक्के त्यानंतर 60 टक्के दिले. सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झालेला आहे. तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होता. पण आता तुमचा पगारा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने शासकीय अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील विधानमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला आता दहा महिने उलटूनही प्रत्यक्ष निधीच्या तरतुदीचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारच्या दिरंगाईविरोधात आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला होता. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन सुरू होते.
राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
SL/ML/SL