भरतीप्रक्रियेत सुधारणा करून सरकारकडून मेगाभरती….

मुंबई दि ७ — राज्य सरकारने सत्तर हजार जागांची भरती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखांच्या वर पोहोचली आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून, भरतीसेवा नियम नव्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
यासंदर्भातील लक्षवेधी सूचना भीमराव केराम यांनी उपस्थित केली होती, त्यावर नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारले. एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेली भरती पूर्ण केली जाणार आहे. सर्व जात वैधता तपासणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, ही वैधता तपासणी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे ही कारवाई अधिक पारदर्शी आणि गतिमान होईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील ६,८६० इतक्या जागांवर बिगर आदिवासी कर्मचारी आढळून आले असून, त्यांना अधिसंख्य पदावर स्थानांतरित करून ही पदे रिक्त करण्यात आली आहेत, त्यापैकी १,३४३ पदे भरली गेली आहेत तर उर्वरित पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, ही सर्व पदे बिंदूनामावली नुसार भरली जातील असं स्पष्ट करताना सफाई कामगारांच्या पदांवर वारसा हक्काने भरती करण्यात येईल असं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. ML/ML/MS