पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दमदाटी, उच्चस्तरीय चौकशी जाहीर

मुंबई दि ४ — धाराशीव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची पोलिस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली.
यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती. पवनचक्की कंपन्यांचे दलाल स्थानिक गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक देतात, कामे करून घेतात, नंतर चेक बाऊन्स होतो. खोटे संमतीपत्र तयार केले जाते. या सगळ्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलीसांकडे गेले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असा विषय पाटील यांनी मांडला. कंपनीचे अधिकारी म्हणतात आम्ही सगळ्यांना पैसे दिले आहेत, आमचे काही होणार नाही, जो शेतकरी विरोध करेल तो गायब होतो, अशी धमकी देतात. पोलीस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना मारहाण करतात, पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांना डांबून ठेवतात एवढी हिंमत कशी येते, पोलीस काय करतात, सरकार अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? असे सवाल कैलास पाटील यांनी विधानसभेत विचारले.
पवनचक्कीप्रकरणी ३१३ तक्रारी आल्या होत्या, त्यातील २१० तक्रारी निकाली निघाल्या आहेत, तर १०३ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. धाराशीव जिल्ह्यात जे प्रकार होतात त्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणांची त्या विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. ML/ML/MS