वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई-नागपूर महामार्ग ठप्प….

वाशीम दि २६:– वाशीम जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार ते अतीमुसळधार पावसाने हजेरी लावली असून, विशेषतः केनवड परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, पिंपरी सरहद्द परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली होती. ऐन पावसाळ्याच्या काळात १८९ गावांमध्ये पाण्याची तुटवडा जाणवत होता. त्यामुळे प्रशासनाने १७९ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून, तर १० गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता.
सामान्यतः जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर टँकर किंवा विहीर अधिग्रहणाची गरज भासत नाही, मात्र यंदा पावसाच्या विलंबामुळे पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले.
काल रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मात्र पुढील काही दिवसांत पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पाणीटंचाईग्रस्त गावांना या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आशा निर्माण झाली असून, जिल्ह्यातील शेतीसाठी ही पावसाची सर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे चित्र आहे. ML/ML/MS