ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे, दि. २० : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर (86) यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. विज्ञान संशोधनातील योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. डॉ नारळीकर यांनी 1988 मध्ये पुण्यात ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
डॉ. जयंत नारळीकर याचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या.
डॉ. नारळीकर हे लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके अशा विपुल साहित्य संपदा लिहिली. नाशिक येथे 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.