भारत-पाक तणावामुळे वाढणार सुक्यामेव्याचे दर

मुंबई, दि. १९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम सुकामेव्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या काजू, अंजीर, बदाम, मनुका, किसमिस आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे दर १०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.या वाढीमागे मुख्यतः आयातीवरील अडथळे आणि वाहतूक खर्चातील वाढ हे कारण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेवर कडक पावले उचलली आहेत. परिणामी व्यापारमार्ग बंद झाल्याने आयात आणि निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. भारतात मोठ्या प्रमाणावर सुकामेवा अफगाणिस्तानमधून आयात केला जातो, परंतु सध्याच्या परिस्थितीत दुबईमार्गे आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्च वाढला आहे.
याशिवाय, सीमाबंदी आणि दहशतवादी कारवाया यामुळे व्यापारमार्ग बंद झाल्याने पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. परिणामी, बाजारात सुकामेव्याचा साठा कमी झाल्याने दर वाढले आहेत.
काजूचे दर – ८४० रुपयांवरून ९६० रुपयांवर गेले आहेत.
अंजीर – ७३० रुपयांवरून ११५० रुपयांवर पोहोचले आहेत.
काळ्या मनुकाचे दर – ४८० रुपयांवरून ९६० रुपयांवर वाढले आहेत.