शेतीतूनच साधली व्यवसायाची संधी, आले पॅकिंग करून विक्री….

 शेतीतूनच साधली व्यवसायाची संधी, आले पॅकिंग करून विक्री….

जालना दि ११– नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांनी स्वकर्तृत्वाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील निमखेडा येथील युवा शेतकरी चैतन्य नामदेव चव्हाण यांनी शेती करतानाच त्यातून मिळणाऱ्या आले पिकातून भविष्याचा वेध घेतला आहे.त्यांनी त्यात आपला रोजगार तर शोधलाच मात्र इतरही अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

चैतन्य यांचे वडील जाफराबादच्या भाजी मार्केट मध्ये भाजीपाला विक्री करायचे नंतर त्यांनी शेतकऱ्यांकडून आले घेऊन त्याची विक्री सुरू केली.
महाविद्यालयीन शिक्षण करतानाच चैतन्य वडिलांच्या या व्यवसायावर लक्ष ठेवून होता.आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात आले पिकवले जाते,आपणच त्याची खरेदी करावी आणि त्याला धुऊन,स्वच्छ करून,त्याची प्रतवारी करून,पॅकिंग करून मसाला उद्योग,बाहेरच्या राज्यातील व्यापारी यांना आपण विकू शकतो याचा अभ्यास चैतन्य यांनी केला.
याच वेळी त्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली.या योजनेतून त्यांना जाफराबादच्या भारतीय स्टेट बँकेने10 लाखांचे कर्जही दिले.

मध्यप्रदेशातील सेंधवा येथून चैतन्य यांनी आले स्वच्छ करण्याची मशिनरी विकत घेतली आणि आपल्या गावातच आले स्वच्छ करून,प्रतवारी करून,पॅकिंग करून मसाले तयार करणाऱ्या उद्योगांना पाठवण्यास सुरुवात केली. उद्योगांना चांगल्या प्रकारचे आले मिळू लागल्याने चैतन्य यांच्या कडे मागणी वाढू लागली.मागील वर्षापासून त्यांनी जाफराबाद शहराच्या निमखेडा रोडवर आपल्या मालकीचे आले वाशिंग सेंटर सुरू केले आहे.

या ठिकाणी दररोज जवळपास 25 ते 30 टन आल्याची आवक होते. त्यासाठी चैतन्य यांनी मध्य प्रदेश राज्यातून खास मजूर आणले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत या उद्योगाच्या माध्यमातून जवळपास 250 ते 300 मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
शेतकऱ्याचे आले जागेवर खरेदी करून ती काढून,स्वच्छ धुऊन ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी चैतन्य हे स्वतः सांभाळत असतात. या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.गेल्या वर्षात त्यांची 5 ते 6 कोटींची उलाढाल झाली असून या वर्षातही अजून जास्त उलाढाल होत आहे.

जाफ्राबाद तालुक्यात सध्या सोनखेडा,देऊळगाव उगले, सोनगिरी,काळेगाव, बुटखेडा, अकोला,खामखेडा आदी भागात मोठ्या प्रमाणावर आल्याचे उत्पादन घेतल्या जात आहे.या उद्योगातून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा कल आले पिकाकडे अधिक वाढला आहे.चैतन्य यांच्या या आले सेंटरवर जालना जिल्ह्यासह परिसरातील बुलढाणा,छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातून ही आले येत आहे.

ते खरेदी करण्यासाठी विविध राज्यातील व्यापाऱ्यांचा राबता आता वाढू लागला आहे.
शेतकऱ्यांना मिळणारा चांगला भाव,अद्रक काढणी पासून विक्री पर्यंतचे योग्य नियोजन, विनम्र सेवा,तत्काळ पैसे मिळत असल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करतात. मालाची उत्तम प्रत असल्याने चैतन्य यांचा आले व्यवसाय जाफराबाद ते दिल्ली आणि कलकत्ता पर्यंत पसरला आहे.UP, बिहार, राजस्थान, ओडिशा,पश्चिम बंगाल, झारखंड,कर्नाटकात चैतन्य यांच्या कडील आल्याची मागणी वाढत आहे.

ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *