वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू….

चंद्रपूर दि १०:–चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल गावाशेजारच्या जंगलात ही घटना उघडकीस आली. सिंदेवाही शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा-माल गावातील या महिला गावातील अन्य महिलांसह जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेल्या होत्या. दुपारपर्यंत या महिला घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. वनविभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतल्यावर तिघींचे मृतदेह आढळले. मृतक महिलांमध्ये सासू-सुनेचा समावेश आहे.
कांता बुधाजी चौधरी (65-सासू), शुभांगी मनोज चौधरी (28-सून) आणि रेखा शालिक शेंडे (50) अशी मृतकांची नावं आहेत. सर्व मृतक मेंढा-माल येथील रहिवासी आहेत. वनविभागाने मौका पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्ट मॉर्टम साठी सिंदेवाहीला रवाना केले आहेत. घटनास्थळी तातडीने कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून हल्लेखोर वाघिणीचा शोध सुरू आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एकाच वेळी 3 लोकांचा जीव जाण्याची जिल्ह्यातील आणि बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.
ML/MS