बलुच आर्मीने पाक विरोधात दिला स्वातंत्र्याचा नारा

इस्लामाबाद. दि. ९ : पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानची पुरती पिछेहाट केली आहे. पाकला विविध आघाड्यांवर पराभूत करत भारतीय सैनिक पराक्रम गाजवत आहेत. बेजार झालेल्या पाकची आता दुसऱ्या बाजूनेही कोंडी झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकच्या अत्याचारांविरुद्ध लढणाऱ्या पाकमधील बलुचिस्तान या प्रातांने या अस्थिरतेचा फायदा करून घेत स्वातंत्र्याचा नारा दिला आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक असलेल्या गटांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. क्वेटा शहरातच पाकिस्तानी सुरक्षा दलांना कमीतकमी चार मोठे हल्ले परतवून लावावे लागले आहेत. बलुचिस्तानचे लेखक मीर यार बलुच यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, बलुचांनी आपले झेंडे फडकवण्यास सुरुवात केली आहे आणि पाकिस्तानी झेंडे उतरवले जात आहेत. त्यांनी जगाला पाकिस्तानमधील दूतावास बंद करून बलुचिस्तानमध्ये उघडण्याची विनंती केली आहे. मीर म्हणाले की, “लवकरच पाकिस्तानच्या विभागणीची घोषणा होऊ शकते, कारण आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दावा केला आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, बलुच आर्मीच्या कमीतकमी तीन गटांनी बलुचिस्तान प्रांताच्या अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात बलुच विद्रोही इमारतींवरून पाकिस्तानचे झेंडे उतरवून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करत आपले झेंडे फडकवत आहेत. माजी पाक पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनीही कबूल केले आहे की, सरकार आणि सैन्याचे बलुचिस्तानवरील नियंत्रण सुटत आहे. बलुचिस्तानच्या समर्थकांनी जगाला मदतीसाठी आवाहन केले आहे.