दगड, माती आणि वाळू उत्खननाचे आभाळ फाटले , महसूलमंत्र्यांची कबुली

मुंबई दि २० — राज्यात सुरू असलेल्या असंख्य विकास कामांसाठी दगड , माती आणि वाळू यासाठी अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं असून काही ठिकाणी तर आभाळ फाटल्याची स्थिती आहे, यासाठी संपूर्ण राज्याचे द्रोण सर्वेक्षण करून उत्खनन किती झालं याची माहिती घेऊन त्यासाठीचे स्वामित्व धन दंडासह वसूल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली.
यासंदर्भातील मूळ प्रश्न प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता, त्यावर जयंत पाटील, रणजीत सावरकर, अस्लम शेख , राजकुमार बडोले यांनी उपप्रश्न विचारले. यापुढे विकासकामे आणि प्रकल्पाची कामं सुरू करताना त्यात स्वामित्व धनाचा समावेश केला जाईल , ती संबंधित कंत्राटदाराच्या देयकातूनच वसूल करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.
राज्यात नवीन वाळू धोरण आणून दगडापासून वाळू बनविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर क्रशरना परवानगी दिली जाईल , त्यासाठी सिंगल विंडो पद्धतीने तीन दिवसांत परवानगी देण्यात येईल असं ही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. या धोरणानुसार ज्या गावातून स्वामित्व काढलं जाईल त्या गावाला त्या स्वामित्व धनाचा फायदा देण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.