लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्य गैरहजर , मंत्री संतापले

मुंबई दि १९—आज सकाळी विधानसभेच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेसाठी होत्या मात्र ती उपस्थित करणारे सदस्यच गैरहजर असल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या सूचना आता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यांनी याबद्दल जोरदार आक्षेप घेत चांगलाच संताप व्यक्त केला, अध्यक्षांनी तातडीने त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
गेले चार दिवस हे असं सातत्यानं होत असून एखाद वेळी मंत्री गैरहजर असले की आरडाओरड होते, बैठक स्थगित होते मग सदस्यांना वेगळा न्याय का असा सवाल त्यांनी पीठासन अधिकाऱ्यांना विचारला, यावर अध्यक्षांशी बोलून निर्णय घेऊ असं पीठासन अधिकारी बापू पठारे यांनी सांगितलं.
रोज असंख्य लक्षवेधी सूचना आमच्यासमोर येतात त्यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तयारी करून आम्ही सकाळपासून येतो मात्र संबंधित सदस्य गैरहजर असले तर दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा येतात हे असं कसं चालेल अशी विचारणा मंत्री सामंत यांनी केली होती.
अकोला शहरासाठी नवीन आराखडा
अकोला शहरासाठी चारशे कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे त्यातून शहराचा विकास करण्यात येणार आहे , त्यासाठीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना साजिद पठाण यांनी उपस्थित केली होती, त्यावर रणजीत सावरकर आणि अर्जुन खोतकर यांनी उपप्रश्न विचारले.
मलनिःसारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय शहरातील रस्ते नव्याने तयार करू नयेत अशा सूचना महापालिकेला देण्यात येतील म्हणजे पुन्हा पुन्हा रस्ते नादुरुस्त होणार नाहीत असं मंत्री म्हणाले.
देवाची उरळी आणि फुरसुंगी साठी नवीन करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर तेथील सर्व मुद्द्यांसाठी याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णय तातडीने लागू करण्याचे निर्देश सर्व संबंधिताना देण्यात येतील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना विजय शिवतारे यांनी उपस्थित केली होती.