९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली,दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून राजधानी दिल्लीत तीन दिवसीय ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित आहेत. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मराठी साहित्याच्या या संमेलनात महाराष्ट्राची सांस्कृतिक विरासत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. पहिल्या आयोजनापासून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा देश साक्षी राहिला आहे. महादेव गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, वीर सावरकर, देशातील अनेक महान व्यक्तींनी या संमेलनाची अध्यक्षता स्वीकारली आहे. आज शरद पवार यांच्या आमंत्रणावरून मला या गौरवपूर्ण परंपरेबरोबर जोडण्याचं भाग्य मिळालं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे आपले १०० वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “मराठी सारस्वतांची दिंडी आज दिल्लीला आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. नोकरी कामाच्या निमित्ताने अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतात. मराठी साहित्याचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी आपण इथे जमलो याचा मला मनापासून आनंद आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
“1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संमेलनाचे उद्घाटन केलं होतं. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगीळ यांचं फार मोठं योगदान होतं. यानंतर 70 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत संमेलनाचे उद्घाटन होत आहे याचा आनंद आहे”, असं शरद पवार म्हणाले.
आज दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काश्मिरी कन्या रुकय्या मकबूल हिच्या आवाजात मराठीप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या प्राकृत भाषेतील सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या मंगलकामना करणाऱ्या जैन धर्मातील नवकार मंत्राने सुरुवात झाली. तर संत ज्ञानेश्वर यांचे पसायदान शमीमा आख्तर यांचे आवाजात झाले व उद्घाटन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
SL/ML/SL
21 Feb. 2025