ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक ‘पाचोळाकार’ रा. रं. बोराडे यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार, माजी प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यातच त्यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सुमारे ५५ वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली होती.
आमदार सौभाग्यवती ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. त्यावर नाटकही आले आहे. चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता. कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथासंग्रहासह शिका तुम्ही हो शिका ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. यासह अनेक मान-सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.
राज्य सरकारने बोराडे यांची 2000 साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सरकारी गोदामात सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करवली. खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा निश्चय रा. रं. बोराडे यांनी अगदी उमेदवारीच्या काळातच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या चाहत्यांनी अनेक वर्षे त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावला होता. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका होती.
TM/ML/SL
11 Feb. 2025