चौकशीत दोषी आढळल्यासच धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई

 चौकशीत दोषी आढळल्यासच धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केवळ संशयाच्या आधारे आणि इतरांनी केलेल्या आरोपांच्या आधारे कोणाचाही राजीनामा घेणे योग्य नाही, बीड प्रकरणात ज्या चौकशा सुरू आहेत त्या पूर्ण झाल्यानंतरच, त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची शक्यता त्यांनी जवळपास फेटाळली आहे .

बीड मधील सरपंच हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग अप्रत्यक्षरीत्या आहे असा आरोप होत असतानाच त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी वारंवार केली आहे. यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधांबाबत काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात या हत्या प्रकरणाशी मुंडे यांचा थेट संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवरती आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्यांच्यात यावर चर्चा देखील झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना या भेटीतील तपशील अजित पवार यांनी जाहीर केला. या प्रकरणी सुरू असलेल्या तिन्ही प्रकारच्या चौकशांमध्ये जे सत्य समोर येईल त्यानुसारच कारवाई केली जाईल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सुरेश धस काय बोलतात याला आपण फारसे महत्त्व देत नाही, आपली चर्चा ही थेट भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी असते त्यामुळे याप्रकरणी आम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ML/ML/PGB 28 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *