किल्ले विशाळगडावर उरूस साजरा करण्यास मनाई

कोल्हापूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विशाळगड इथे उद्या रविवारी होणाऱ्या उरुस उत्सवाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली आहे. नुकतीच विशाळगडावर पर्यटक आणि भाविकांना जाण्यासाठी अटी – शर्ती लावून परवानगी दिली होती, परंतू गडावरील अतिक्रमणा
विरोधातील कारवाई पूर्ण होत नाही. तोपर्यंत गडावर कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.
ऐतिहासिक किल्ले विशाळगड येथील उरूस हा मोठ्या उत्साहात संप्पन होत असतो, या उरुसाला पश्चिम महाराष्ट्र तसच कर्नाटक मधून मोठ्या संख्येनं हिंदू – मुस्लिम भाविक येत असतात. विशाळगड अतिक्रमण मुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य आणि महत्त्व अबाधित रहावेआणि त्याचे जतन-संवर्धन-संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी, या उद्देशाने विशाळगड मुक्ती आंदोलन छत्रपती संभाजीराजे तसेच विविध संघटनेच्या वतीने १४ जुलै २०२४ रोजी पुकारले होते.
विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनास हिंसक वळण लागून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तसेच विशाळगड अतिक्रमणाचा काहीही संबंध नाही, अशा गजापुरातील मुसलमान वाडीतील घरांची, वाहनांची, दुकानांची, प्रापंचिक साहित्यांची तोडफोड आंदोलनकर्त्यांनी केली होती. परिणामी परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर विशाळगड पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी दिली असली तरी पर्यटकांना नियम तसेच अटी पाळाव्या लागणार आहेत.
पर्यटकांनी नियमांचे आणि अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. प्रशासनाने परवानगी दिल्याने गडवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पर्यटकांना ३१ जानेवारीपर्यंतच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे.
ML/ML/SL
11 Jan. 2025