भर समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचले पर्यटक दाम्पत्य…

रत्नागिरी, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाट्ये येथे समुद्राशी खेळ करण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आल्याचे समोर आले आहे. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला एक पर्यटक दाम्पत्य किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र परतण्याच्या वेळ दरम्यान समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून पर्यटनासाठी आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले.
जीवघेण्या प्रसंगात काय करावे असा प्रश्न त्यांना पडला असताना या दाम्पत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दाम्पत्यासाठी देवदूत ठरले. जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले. जीवाची सुटका होताच दोघा दाम्पत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले.
ML/ML/SL
11 Dec. 2024